Please enable javascript. कोल्हापूरसाठी प्राधिकरण - kolhapur, kolhapur deveopment authority declared - Maharashtra Times

कोल्हापूरसाठी प्राधिकरण

Maharashtra Times | 17 Aug 2017, 3:00 am
Subscribe

कोल्हापूरसह आसपासच्या ४२ गावांच्या सुनियोजित विकासासाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.

kolhapur kolhapur deveopment authority declared
कोल्हापूरसाठी प्राधिकरण

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

कोल्हापूरसह आसपासच्या ४२ गावांच्या सुनियोजित विकासासाठी कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे. नगर विकास विभागाचे अवर सचिव रा. म. पवार यांनी बुधवारी प्राधिकरणची अधिसूचना जाहीर केली. प्राधिकरणला मूर्त रुप आल्याने शहर आणि ग्रामीण विकासासाठी समान अजेंड्याची अंमलबजावणी करता येणार आहे. प्राधिकरणात गोकुळ शिरगाव आणि शिरोली एमआयडीसी समावेश केलेला नाही. या दोन्ही औद्योगिक वसाहतींसह कागल, वडगाव नगरपालिकांचाही प्राधिकरणात समावेश करण्याची मागणी महापालिकेने केली होती. मात्र या दोन्ही पालिकाही वगळल्या आहेत.

प्राधिकरणाच्या घोषणेने शहराच्या हद्दवाढीसाठी चाळीस वर्षांपासूनच्या संघर्षाला यश मिळाल्याच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. प्राधिकरणामुळे हद्दवाढीच्या दिशेने पाऊल, अशा शब्दांत सरकारच्या निर्णयाचे स्वागत झाले. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बाराजणांच्या समितीच्या समावेशाने प्राधिकरण अस्तित्वात येईल. सीईओ दर्जाचा स्वतंत्र अधिकाऱ्याची नेमणूक होणार आहे. नाशिक, नागपूर प्राधिकरणच्या धर्तीवरच कोल्हापूर प्राधिकरण कार्यान्वित असणार आहे.

कोल्हापूरकर गेली चाळीस वर्षे हद्दवाढीसाठी आंदोलन करत होते. गेल्यावर्षी हद्दवाढ विरोधक आणि समर्थक आमनेसामने आल्याने याप्रश्नी तोडगा काढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुढाकार घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांची भेट घडवून आणली. मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली ३० ऑगस्ट २०१६ रोजी झालेल्या बैठकीत तोडगा न निघाल्याने प्राधिकरणाचा पर्याय मांडला होता. अखेर वर्षभरानंतर प्रा​धिकरण अस्तित्वात आले.

००००००००००००

कोल्हापूर शहराचे सध्याचे क्षेत्रफळ ६६.८२ चौरस किलोमीटर

४० गावांच्या समावेशानंतर प्राधिकरणचे क्षेत्रफळ ३४५ चौरस किलोमीटर

कोल्हापूरची लोकसंख्या (२०११ नुसार) ५,४९,२३६

प्राधिकरण क्षेत्राची लोकसंख्या सुमारे ९,२०,०००

………………….

प्राधिकरणातील गावे

करवीर तालुका : शिंगणापूर, हणमंतवाडी, नागदेववाडी, चिखली, आंबेवाडी, रजपूतवाडी, वडणगे, शिये, वळीवडे गांधीनगर, चिंचवाड, मुडशिंगी, नवे वाडदेसह, सरनोबतवाडी, तामगाव, नेर्ली, गोकुळ शिरगाव, कणेरी, कंदलगाव, पाचगाव, भुये, निगवे दुमाला, भुयेवाडी, कणेरीवाडी, मोरेवाडी, सादळे, मादळे, जठारवाडी, पाडळी खुर्द, वाडीपीर, वाशी, नंदवाळ, गिरगांव, कोगील खुर्द, कसबा करवीर, उजळाईवाडी, नवे बालिंगे, कळंबा, उचगाव.

हातकणंगले तालुका : टोप, कासारवाडी, संभापूर, नागाव, शिरोली

………..

‘मटा’चे सर्वप्रथम वृत्त

हद्दवाढीऐवजी प्राधिकरणच होणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘मटा’ने ३० ऑगस्ट २०१६ रोजी दिले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी तातडीने याची घोषणा करण्याची ग्वाही दिली. ते वृत्त अखेर खरे ठरले. या विषयाचा पाठपुरावा ‘मटा’ने सातत्याने केला होता.

००००००

प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालयात

प्राधिकरणचे कामकाज, जिल्हाधिकारी कार्यालयात सुरु होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्राधिकरणचे कार्यालय स्थापन होऊन त्याचे कामकाज सुरळीतपणे सुरु होईल या पध्दतीने कार्यवाही करण्याच्या सूचना नगर विकास विभागाने दिल्या आहेत.

बारा सदस्यांची स​मिती

पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत बारा सदस्य असतील. त्यात जि. प. अध्यक्ष, महापौर, करवीर पं. स. सभापती, हातकणंगले सभापती, आयुक्त,जिल्हाधिकारी, सीईओ, जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता (पुणे) अथवा त्यांनी नियुक्त अधीक्षक अभियंता दर्जाचा अधिकारी, जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमि अभिलेख असे पदसिद्ध सदस्य आहेत. अध्यक्षांना समिती सदस्यांतील एकाला उपाध्यक्षपदी नेमण्याचा अधिकार आहे.

=====

प्राधिकरणाच्या माध्यमातून नियोजनबद्ध, शाश्वत विकास करता येणार आहे. गावांचा विकास शहरासारखाच करणे शक्‍य होणार असून, प्राधिकरणासाठी सरकार स्वतंत्रत निधी देऊ शकते. ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींचे हक्क अबाधित राहून शाश्वत विकास साधता येईल. शहर आणि लगतच्या ग्रामीण भागालाही विकासाची मोठी संधी मिळणार असून ‘मिनी शहर’ म्हणून लगतच्या गावांचा विकास होणार आहे.

चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
कॉमेंट लिहा

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज